मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत.
यातील १४ परीक्षेचे ८० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे वितरित करण्यात आली आहेत. या प्रवेशपत्रात काही दुरूस्ती असेल तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन मागील दोन महिन्यापासून सुरू केले होते. यानुसार मागील महिन्यात परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. त्याचबरोबर नोव्हेंबरपर्यंतच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. तसेच ३ ऑक्टोंबरपासून परीक्षेचे प्रवेशपत्रेही वितरित करण्यात आले आहेत.
हिवाळी सत्राच्या परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार घेऊन याचे निकालही नियोजित वेळेत जाहीर करण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी परीक्षा विभागास दिले आहेत. त्यानुसार कुलगुरू, प्रकुलगुरू व कुलसचिव स्वतः लक्ष देत आहेत.
हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांना परीक्षेची तारीख, वेळापत्रक व प्रवेशपत्रे वेळेत दिली आहेत व देण्यात येणार आहेत. तसेच या परीक्षा घेऊन त्याचे मूल्यांकन वेळेत करून निर्धारित वेळेत निकाल जाहीर करण्यात
येणार आहेत.– डॉ. प्रसाद कारंडे, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ