मुंबई :
शाळा सुरू करण्यासंदर्भातील विविध संघटनांच्या मागणीमुळे राज्य सरकारने २४ तारखेपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय हा स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील विविध महापालिकांकडून याबाबत निर्णय घेण्यात येत असला तरी मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबतचा पालिका आयुक्त शुक्रवारी निर्णय घेणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईतील शाळांचे भवितव्य २१ जानेवारीला ठरणार आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करत राज्यातील पहिली ते बारावी तसेच शिशुवर्गही सुरू करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी जाहीर केला. मात्र हा निर्णय जाहीर करताना शाळेतील व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक, सीईओ, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, आयुक्त असे स्थानिक प्रशासनाच्या माध्यातून अंतिम निर्णय घेण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार राज्यातील विविध स्थानिक प्रशासनाकडून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तांना प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर मुंबई महापालिका आयुक्त शुक्रवारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिकेच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब होईल, असे पालिकेच्या शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.