मुंबई :
कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांना जेवण उपलब्ध करून त्यांचे भूक भागवणार्या शिवभोजन केंद्रावर आता सरकारकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. शिवभोजन केंद्रावर होत असलेल्या गैरप्रकाराच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता कारवाई करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
शिवभोजन केंद्र चालकांना थाळीचा लाभ घेणार्या व्यक्तीचा फोटो एका अँप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याचा नियम आहे. मात्र या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यापुढे शिवभोजन केंद्रापासून १०० मीटरच्या आत म्हणजेच शिवभोजन केंद्रावर उपस्थित राहूनच हे फोटो अपलोड करावे लागणार आहेत. तसेच शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी अधिकार्यांची पथके तयार करा. शिवभोजनच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे, देखील भुजबळ म्हणाले.
सीसीटीव्ही बसवण्यास वाढीव मुदत
शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र प्रत्येक शिवभोजन केंद्रचालकांकडून वाढीव अवधी मागण्यात आल्याने शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक महिन्याचा अवधी वाढवून दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
शिवभोजन थाळी योजना २६ जानेवारी २०२० पासून झाली. ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राज्यात सुमारे ८ कोटी ३४ लाख ९५ हजार ८५७ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. अल्पकालावधीत ही योजना लोकप्रिय झाली असून राज्यात १ हजात ५२१ शिवभोजन केंद्र आहेत.