मुंबई :
नांदेड येथील सरकारी रुग्णालयापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रुग्ण मृत्युमुखी पडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात कळवा आणि गेल्या दोन दिवसांत या दोन ठिकाणच्या या घटनांवरून सरकारी आरोग्ययंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसत आहे. या घटनांना शिंदे सरकार आणि आरोग्यमंत्र्यांची निष्क्रिया कारणीभूत आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना सत्तेत रहाण्याचा अधिकार नाही, असा घणाघात मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवात केला आहे.
सत्तेसाठी इतर पक्षांमधील नेते फोडून आपल्या पक्षांच्या दावणीला बांधण्यात व्यग्र असलेल्या शिंदे सरकारला जनसामान्यांच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नसल्याचं हे उदाहरण आहे. आरोग्यमंत्री हे मारेकरी होत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने केली आहे.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेकडे किती गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, हे कोरोना काळातच अधोरेखित झालं होतं. त्या वेळी आमच्या महाविकास आघाडी सरकारने परिस्थिती उत्तम हाताळली होती. मात्र गेल्या वर्षभरापासूनच राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. ऑगस्ट महिन्यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये नांदेडच्या शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय येथे एकूण ४३ रुग्ण दगावले. हे सरकारचं अपयश असल्याची टीकाही प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
एकीकडे निमशहरी आणि ग्रामीण भागांतील रुग्णालयांची ही अवस्था असताना मुंबईतही परिस्थिती बिकट होत आहे. मुंबईतील सरकारी रुग्णालयं ओसंडून वाहत आहेत. डेंग्यु, मलेरिया हे दोन आजार मुंबईकरांचा पिच्छा सोडत नाहीत. मुंबईत मलेरियाचे जूनमध्ये ६७६, जुलैमध्ये ७२१, ऑगस्टमध्ये १०८० रुग्ण सापडले. तर, डेंग्यूचे जूनमध्ये ३५३, जुलैमध्ये ६८५, ऑगस्टमध्ये ९९९ रुग्ण सापडले. सप्टेंबरमध्ये मलेरियाचे ७५६ आणि डेंग्युचे ७०३ रुग्ण आढळले आहेत. ही वाढती संख्या सरकारचा अकार्यक्षमपणा दाखवते, असा आरोप प्रा. गायकवाड यांनी केला.
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती लागते. पण या सरकारची इच्छाशक्ती फक्त आमदार, नगरसेवक आणि इतर पक्षांचे नेते फोडण्यातच खर्ची होते. या सरकारला लोकांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्नांचं गांभीर्यच उरलेलं नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सरकारी रुग्णालयांच्या दुर्दशांची आणि त्यामुळे ओढवणाऱ्या मृत्यूंची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणीही मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.