मुंबई :
राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध हटवले असले तरी पुढील तीन ते चार महिने नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरच मृत्यूंची संख्या शून्यावर आली आहे. सहव्याधींमुळे होणार्या मृत्यूची नोंद करण्याबरोबरच उर्वरित मृत्यू हे आकस्मिक मृत्यू असल्याचे निरीक्षण मांडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना संसर्ग हा शेवटच्या टप्प्यात असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे गरज असल्याचे कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
मुंबईतील कोविड वॉर्ड रिकामे असून कोरोना रुग्णांसा समर्पित असलेल्या कस्तुरबा रुग्णालयातही रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. कोरोना रुग्ण क्वचित रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र देशाच्या अन्य भागांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन पुढील दोन आठवडे निरीक्षणाखाली राहणार असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. मुंबईत २८ दिवसांत १,३३६ कोविड रुग्ण आढळले. तर तीन मृत्यू नोंदविण्यात आले. तर राज्यामध्ये याच कालावधीत ७,२३९ कोविड रुग्ण आढळले असून ३६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५० इतकी असून, पुढील महिन्यात ती पाचवर येण्याची शक्यता आहे. यावरून राज्यातील कोरोनाची तिसरी लाट संपली असून, सध्या तुरळक रुग्ण आढळत असल्याचे राज्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.