मुंबई :
यजमान परभणीने ‘३२व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी’ कबड्डी स्पर्धेत एकतर्फी विजय मिळविले. किशोर गटात गत विजेत्या ठाण्याला सोलापूरने अखेर पर्यंत झुंजवले. तर किशोरी गटात मुंबई उपनगरला साखळीतील पहिल्याच सामन्यात पालघरकडून पराभवाचा धक्का. परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडा नगरीत आज पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला.

महिलांच्या ब गटात गतउपविजेत्या मुंबई उपनगरला पहिल्या साखळी सामन्यातच पराभवाला सामोरी जावे लागले. पालघरने मुंबई उपनगरला ३८-२६ असे पराभूत करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. मध्यांतरालाच पालघरकडे १९-१० अशी आघाडी पालघरकडे होती. या विजयाचे सारे श्रेय ग्रीष्मा वनारसे, हनी प्रसाद यांना जाते. उपनगरची सानिया इंगळे एकाकी लढली.
मुलांच्या अ गटात गटविजेत्या ठाण्याला सोलापूरने चांगलेच झुंजवले. अखेर ठाण्याने २८-२७ अशी बाजी मारली. मध्यतराला ठाण्याकडे १२-११ अशी आघाडी होती शेवटी तीच त्यांच्या कामी आली. शेवटची २ मिनिटे पुकारली तेव्हा २७-२२अशी सोलापूरकडे आघाडी होती आणि त्यांचे दोन खेळाडू शिल्लक होते. शेवटच्या क्षणी लोण देत ठाण्याने ही आघाडी कमी करीत २७-२७ अशी बरोबरी साधली आणि वेदांत वाघ यांनी शेवटच्या चढाईत गडी टिपत ठाण्याला विजयी केले. या विजयात त्याला चंद्रप्रकाश चव्हाण, तनीश कदम, विवेक यादव यांची देखील मोलाची साथ लाभली. सोलापूरच्या आदित्य नल्ले, प्रदीप गायकवाड यांची कडवी लढत अयशस्वी ठरली.
मुलांच्या क गटात परभणीने नांदेडला ५०-०२ असे नमवित आगेकूच केली.मध्यंतरापर्यंत तीन लोण देत परभणीने ३२-००अशी आघाडी घेतली होती.बबलू घाडगे, अतुल जाधव यांचा झंजावाती खेळ या विजयात महत्वाचा ठरला. मुलींच्या ब गटात परभणीने लातूरचा ८१-१४ असा पाडाव करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. दिशा चव्हाण , अलफिया शेख यांचा चतुरस्त्र खेळमुळे हा विजय सोपा झाला.