मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी अद्यापही संकट टळलेले नाही. तिसर्या लाटेची शक्यता पूर्णत: मावळली नसल्याने पुढील काही दिवस खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र निर्बंधात शिथिलता आल्याने रस्त्यांवर गर्दीमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात येणारे फेरीवाले, दुकानदार, ऑटो आणि टॅक्सीचालक आदी सुपरस्प्रेडर नागरिकांच्या लसीकरणावर भर दण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दररोज ५०० जणांचे लसीकरण करण्याचे उदिष्ट्ये पालिकेने ठेवले आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता आणत, मंदिरे, चित्रपटगृहे, जिम, शाळा हळूहळू सुरू करत आहेत. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी तसेच रेल्वेमध्ये गर्दी वाढत आहे. त्यातच सध्या असलेल्या सणासुदींच्या दिवसांमुळे नागरिकांच्या होणार्या गाठीभेटी, खरेदीकडे असलेला कल यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अद्यापही असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढती गर्दी लक्षात घेता पुढील एक ते दोन महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. वाढत्या गर्दीमध्ये सुपरस्प्रेडरकडून सर्वाधिक धोका असल्याने फेरीवाले, दुकानदार, ऑटो आणि टॅक्सीचालक यांचे लसीकरण तातडीने करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार फेरीवाले, दुकानदार, ऑटो आणि टॅक्सीचालक, भाजीवाला, हॉटेल वेटर, कर्मचारी, डिलिव्हरी बॉय आणि ड्रायव्हर यांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. खाजगी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या गटांच्या लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. सध्या जीविका हेल्थ केअरच्या माध्यमातून दररोज १०० हून अधिक रस्त्यावर विक्रेत्यांना लसीकरण करण्यात येत आहे. ही संख्या वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. लोकांच्या थेट संपर्कात येणार्या समुहातील ५०० लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.