नवी दिल्ली :
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या अद्यनाडका गावातले कल्पक शेतकरी अमाई महालिंग नाईक यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डोंगर उतारावरच्या कोरड्या जमिनीचे कल्पकतेने झिरो एनर्जी अर्थात शून्य उर्जा सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या माध्यमातून सुपीक शेतात रुपांतर केल्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
आयसीएआर-सीसीएआरआय म्हणजे भारतीय कृषी संशोधन संस्था-केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था यांच्या संचालकांनी दोन संशोधकांचा समावेश असलेले एक पथक स्थापन केले. या पथकाने या शेतकर्याची भेट घेऊन उत्तम दर्जाच्या छायाचित्राद्वारे त्याच्या तंत्रज्ञानाचे दस्तावेजीकरण करत पद्म पुरस्कार २०२२ साठी त्याचे नामनिर्देशन करणारा अर्ज तयार केला. अमाई महालिंग नाईक यांनी आपल्या शेतात पाणी आणण्यासाठी एकहाती ३१५ फुट लांबीचे सहा बोगदे खणले. पाणी पाझरण्यासाठी त्यांनी शेताभोवती ३०० चर खणले. त्यासाठी त्यांनी सुमारे पाच हजार मोठे लॅटराइट दगडही त्यांनी स्वतःच वाहून आणले. त्यांनी दोन संरक्षक बांध (१५ फुट लांब, ३० फुट रुंद आणि ५ फुट उंच) आणि १२ हजार लिटर क्षमतेचा हौदही बांधला. ३०० पोफळी, ७५ माड, १५० काजूची झाडे, केळीची २०० रोपे आणि मिरीचे वेल यांची लागवड करत त्यांनी ओसाड जमिनीचे नंदनवन केले. याशिवाय त्यांनी मधुमक्षिका पालन आणि गायींना पोषक आहार म्हणून अझोला निर्माण केला. स्वबळावर केलेल्या या प्रयत्नाने त्यांनी ‘एकांडा शिलेदार’ आणि ‘टनेल मॅन’ म्हणून नाव लौकिक प्राप्त केला. नाईक यांचे शेत म्हणजे प्रत्येकाने आवर्जून पाहावे असे आदर्श शेत ठरले आहे. वर्षाला परदेशी पर्यटकासह एक हजारांपेक्षा जास्त जणांनी इथे भेट दिली आहे. पद्मश्री मिळाल्याची बातमी ऐकताच, आपले कठोर परिश्रम आणि कल्पकता यांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आयसीएआर-सीसीएआरआय गोवा आणि भारत सरकार यांचे आभार मानले.