मुंबई :
राज्यात गेल्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. यामध्ये वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा वाटा अधिक आहे. वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती तसेच उपाययोजना करण्यासाठी पुणे येथे पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. राज्यात होत असलेल्या जनजागृतीमुळे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आहे. दुचाकी व चारचाकीच्या विक्रीबरोबरच आता राज्यात ई-रिक्षालाही प्रोत्साहन देण्यावर पुढील काळात भर दिला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून राज्यात पुढील काळात मुंबई किंवा नाशिक येथे नागरी नियोजनबाबत जागतिक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरमध्ये कृषी क्षेत्रातील पर्यावरणाच्या अनुषंगाने परिषद आणि नागपूर येथे हरित ऊर्जा परिषद घेण्यात येईल. हरित इकोसिस्टीमसाठी हरित इंधनाद्वारे वीजनिर्मिती याबाबत विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.