नवी दिल्ली
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष २०२१ चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवडने दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ चे राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणा-या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री पुरी यांच्या हस्ते वितरीत करूण गौरविण्यात आले. तसेच केंद्रीय राज्य मंत्री कौशल यांच्या हस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या ४० टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील १४७ शहरांचा समावेश आहे. यामध्ये राज्यातील ५५ शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील १४३ शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील ६४ शहरांचा समावेश आहे. फाईव्ह स्टार मानांकनामध्ये देशभरातील ९ शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महापालिकेला ६ कोटींचा धनादेश बक्षिस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण ४८ शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील १० शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणार्या १०० शहरांमध्ये राज्यातील २७ शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणार्या १०० शहरांमध्ये राज्यातील ५६ शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगीरी साठी राज्याला देशातील दुसर्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मिशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे. यातून राज्याची मान देशातही नाही तर जगातही गौरवाने उंचावली आहे. ग्रामीण क्षेत्रासह आता नागरी क्षेत्रानेही स्वच्छता चळवळीला आपलेसे केले आहे. लोकसहभाग हा स्वच्छता चळवळीचा आत्मा आहे. आपल्या राज्यात नागरिकांनी आवर्जून आणि सातत्यपूर्ण असा सहभाग घेतला आहे. यामुळेच हे यश मिळविता आले आहे. या यशासाठी या नागरिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पुरस्कार प्राप्त सर्व नगरपालिकांचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्वांचे या निमित्ताने अभिनंदन.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य