मुंबई :
रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा पाकिट मारल्याच्या घटना घडतात. गेल्या चार वर्षांमध्ये मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेवर ६५ हजारांहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. या चोरी गेलेल्या मोबाईलपैकी अवघ्या ९ हजार मोबाईलचा थांगपत्ता लागलेला आहे.
ट्रेनमधील गर्दीचा फायदा घेऊन दररोज लोकलमध्ये ५० पेक्षा जास्त मोबाईल चोरीच्या घटना घडत असतात. चोरीचे मोबाईल शोधण्यासाठी लोहमार्ग पोलिसही वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. २०१८ ते २०२१ या चार वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल ६५ हजार ४२१ मोबाईल चोरी गेले आहेत. २०१८ मध्ये ३२ हजार ३२९ मोबाईल चोरीची नोंद झाली असून, त्यानंतर २०१९ मध्ये २३ हजार ९३९ मोबाईल, २०२० मध्ये ५ हजार ८५ मोबाईल आणि २०२१ मध्ये ४ हजार ६८ मोबाईल चोरीची नोंद झाली आहे. कोरोनामुळे २०२० आणि २०२१ मध्ये रेल्वे प्रवासावर निर्बंध असल्याने या दोन वर्षांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. चार वर्षांत चोरीला गेलेल्या ६५ हजार ४२१ मोबाईलपैकी लोहमार्ग पोलिसांना फक्त ८ हजार ९२१ मोबाईलचा शोध लावण्यात यश आले आहे.
या राज्यांमध्ये सापडले चोरीचे मोबाईल
मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रेल्वेने एक विशेष पथक नेमले आहे. या पथकाने चोरीला गेलेला मोबाईल ट्रेस केला असता हे मोबाईल उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये विकण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. उत्तरप्रदेश १ हजार १०२, बिहार ४४२, पश्चिम बंगाल ४४१, महाराष्ट्र ४२४, मुंबई ३९८, कर्नाटक २४२, गुजरात २०५, आंध्र प्रदेश १८९, तामिळनाडू १७८, मध्य प्रदेश १५०, राजस्थान १०८, ओडिशा ४०, दिल्ली ४८, हरियाणा २८, पंजाब २७, केरळ २१, जम्मू आणि काश्मीर १९,आसाम १९ आणि उर्वरित राज्यांमध्ये १२ असे चार हजार १०३ चोरीचे मोबाईल शोधण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.