मुंबई :
मुंबईचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये नियोजित विकास झाला पाहिजे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकणी यांनी मुंबई, नवी मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी १० लाख क्षमतेची स्मार्ट सिटी उभारण्याची सूचना राज्य सरकारला केली.
प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बेलापूर, नेरुळ येथे मंजूर झालेल्या जेट्टींच्या उभारणीची अमंलबजावणी झाल्यास मुंबईतील कोणत्याही भागातून जलमार्गाने अवघ्या १३ ते २१ मिनिटांत नवी मुंबई विमानतळावर पोहचता येईल. असे सागंत गडकरी यांनी राज्य सरकारने वॉटरटॅक्सी सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले. रविवारी सायंकाळी पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ४१३५.९१ हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन झाले. यात, ३,५०० कोटींचा जेएनपीटी बंदर रस्ते जोडणी प्रकल्पाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, कळंबोली जंक्शन सुधार प्रकल्प, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे भूमीपूजनाचा यात समावेश आहे.
पनवेलमधील वाहतुकीचा ताण कमी करणार
पनवेल वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने ३२ किलोमीटर लांबीचा उरण-जेएनपीटी-चौक असा असणारा नवीन महामार्ग चिरनेरपासून सुरू करण्यात येणार आहे. हा महामार्ग मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे या तिन्ही रस्त्यांना जोडणारा असून, त्यावर चार बोगदे आहेत. हा मार्ग भारतामाला योजनेंतर्गत पूर्ण करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.