मुंबई
विविध स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार्या खेळाडून अनेकदा अपुर्या सुविधांमुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. दैनंदिन भत्ते, साहित्य, स्पर्धेसाठी प्रवासाची तिकिटे यासारख्या सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागत असे. मात्र विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास कमी करण्याचा निर्णय घेत मुंबई विद्यापीठाने खेळाडूंना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकताच अमरावती येथे होणार्या कबड्डी स्पर्धेसाठी रवान झालेल्या संघाला विद्यापीठाकडून सर्व सुविधा पुवण्यात आल्या.
मुंबई विद्यापीठाच्या फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, बास्केटबॉल, कबड्डी यासारख्या विविध संघाकडून खेळणार्या प्रत्येक खेळाडूला दैनंदिन भत्ता २५० रुपये दिला जातो. त्यातही तो कधीही वेळेवर मिळत नाही. खेळाडूंना चांगल्या दर्जाचे किट मिळणे, स्पर्धेच्या ठिकाणी प्रवासाची सुविधा मिळण्यात अनेकदा अडचणी येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या खेळावर होत असे. यासंदर्भात युवासेने सिनेट सदस्यांकडून मुंबई विद्यापीठाच्या खेळ व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मोहन अमृले यांच्याकडे निवेदनाद्वारे सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत अखेर मुंबई विद्यापीठाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या संघाच्या खेळाडूंना सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन भत्ता २५० रुपयांवरून हजार रुपये करण्यात आला आहे. रोखीने मिळणार्या भत्त्यामध्ये अनियमितता असल्याने तो थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार फुटबॉल (मुली), बास्केटबॉल (मुली), व्हॉलीबॉल (मुली), बॉक्सिंग (मुली), बास्केटबॉल (मुले) या खेळाडूंच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. तसेच खेळाडू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे क्रीडा साहित्य, त्याचप्रमाणे स्पर्धेच्या ठिकाणी रेल्वे प्रवास आरक्षित तिकिटावर करण्यात येईल शिवाय आपत्कालिन परिस्थितीत विमानाने प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी गुणवान आणि पात्र खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभाग असे चार विभागांचे संघ करून त्यातून स्पर्धेसाठी मुख्य संघ निवडण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
कोवीड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच मुंबई विद्यापीठ कबड्डी खेळाचा संघ अमरावती येथे पश्चिम विभाग स्पर्धेसाठी नुकताच रवाना झाला. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, संचालक डॉ.मोहन आमृले, प्रशिक्षक डॉ. यशवंत पाष्टे यांनी त्यांना किटचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.