मुंबई :
एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली तर काही विद्यार्थ्यांची ९ एप्रिलपासून ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेतील या तफावतीमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.
उषा मित्तल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनींची नुकतीच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. मात्र डिप्लोमा उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनींची महाविद्यालयाकडून ९ एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीन परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थींनींची ऑनलाईन तर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत असल्याने या विद्यार्थींनींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत या विद्यार्थींनीना कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. एकाच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीबाबत महाविद्यालय दुजाभाव दाखवत असल्याने त्यांने नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी थेट प्रवेशित विद्यार्थिनींची ऑनलाईन परीक्षा घेण्याचे निर्देश एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला देण्यात यावे अशी मागणी युवासेनेचे प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे केली आहे.
विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांना युवासेनेच्या वतीने निवेदन दिले. त्यांनी तातडीने सह संचालक डॉ.प्रमोद नाईक यांना चौकशी करून महाविद्यालयाकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले आहेत.
– प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना