मुंबई:
राज्यातील महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त असलेली विविध विषयांच्या प्राध्यापकांची पदभरती लवकर केली जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ट्विटरद्वारे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात तब्बल २ हजार ८८ प्राध्यापक व प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आज प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
— Uday Samant (@samant_uday) November 9, 2021
कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्यांच्या पदभरतीची प्रक्रियाही लांबणीवर पडली होती. आता या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्यांची पदे भरण्याला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी ट्विट करून दिली. राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध विषयांची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानेही वेळोवेळी सूचना केल्या होत्या.
2088 प्राध्यापक भरतीचा GR दोन दिवसातच निघेल.. आणि पूर्ण प्राचार्य भरतीचा सुद्धा👍
— Uday Samant (@samant_uday) November 9, 2021
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी राज्यातील विविध प्राध्यापक संघटना युवासेना, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेकडून वारंवार सरकारकडे मागणी करण्यात येत होती. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य व महाराष्ट्र प्राध्यापक सेनेसे अध्यक्ष डॉ. धनराज कोहचाडे यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच सामंत यांची भेट घेऊन प्राध्यापक पदांची भरती लवकर करण्याची मागणी केली होती.
हे यश प्राध्यापक सेनेचे आहे. प्राध्यापक सेनेच्या मागणीला मान्य केल्याबददल उच्च तंत्र व शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार.
– प्रा. युवराज नलावडे, सहसचिव, महाराष्ट्र प्राध्यापक सेना