मुंबई :
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा, अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ होईल.
मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत. आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत.
२०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. देशाचा आर्थिक केंद्र असणार्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत, या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ अशा शुभेच्छा दिल्या. १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे. सुविधा द्यायच्याच आहे, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे.