ठाणे :
कर्नाटकहुन विरारला जात असलेला टोमॅटोचा ट्रक घोडबंदर रोडवरील गायमुख गावाजवळ शनिवारी मध्यरात्रीच्या उलटला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र टोमॅटोचा खच पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.

कर्नाटकमधील टोमॅटो विक्रेते उमेश गौडा यांच्या मालकीचा ट्रक घेऊन त्यांचा चालक विरारला निघाला होता. मात्र रस्ता चुकल्याने तो विरारकडे जाण्याऐवजी गायमुख चौपाटीच्या दिशेने गेला. गायमुख चौपाटीसमोरील रस्ता दुभाजकावर धडकला. त्यामुळे ट्रक घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर येऊन उलटला. त्यामुळे ट्रकमधील टोमॅटो घोडबंदर रोडवर पडल्याने सर्वत्र टोमॅटोचा खच पाहण्यास मिळाला. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे रस्त्यावर टोमॅटोमुळे सर्वत्र चिखल झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, कासारवडवली पोलिस आणि कासारवडवली वाहतूक पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला टोमॅटोचा खच बाजुला करण्यात आला आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर माती टाकण्यात आली आहे. त्यानंतर घोडबंदर रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.