मुंबई :
राज्य शासनाने १ फेब्रुवारी पासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्नसमारंभासाठी दोनशे व्यक्तीपर्यंत मुभा असेल तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत, याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुधारित नवीन नियमावली जाहीर केली आहे.
सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी हे नियमित वेळेत सुरु राहतील, परंतु इथे भेटी देणाऱ्या सर्व लोकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. नियंत्रण करणाऱ्या प्रशासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर वाजवी निर्बंध लावावे. कोणत्या वेळेला किती लोक याठिकाणी असतील याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला आपल्या पातळीवर घ्यावा लागेल.
राज्यभरात ऑनलाइन तिकिट लागू असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरु राहतील. अशा स्थळांना भेटी देणाऱ्या अभ्यागतांनीही पूर्णपणे लसीकरण केलेले असावे. सनियंत्रण करणाऱ्या प्रशासनाला अशा ठिकाणी एका वेळेला किती लोकांना प्रवेश द्यायचा हे वाजवी कारणांसहित ठरवता येईल. ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय यांना लागू असलेल्या सर्व निर्बंधांसह राज्यातील स्पा क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत सुरु ठेवता येईल. अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसतील.
७० टक्के लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक शिथिल
८ व ९ जानेवारी रोजी अनेक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यातून ज्या जिल्ह्यात १८ वर्ष वयापेक्षा मोठ्या असलेल्या ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे ७० टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने निर्धारित केलेल्या वेळेनुसार समुद्रकिनारे, उद्याने, पार्क सुरु ठेवता येईल. अम्युसमेंट पार्क (मनोरंजन उद्याने), थीम पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु असतील. जलतरण तलाव, वॉटर पार्क हेही ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येईल. उपहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. भजन आणि इतर स्थानिक सांस्कृतिक आणि लोककला- मनोरंजक कार्यक्रम हे दालन किंवा मंडपाच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहू शकतील. उघडे मैदान किंवा कार्यक्रम सभागृह असलेल्या ठिकाणी २५ टक्के क्षमतेने लग्नात उपस्थिती असू शकते किंवा कमाल दोनशे लोक (जी कोणती संख्या कमी असेल) त्यालाही मुभा असेल.
महत्त्वाचे मुद्दे :
- रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत कोणते निर्बंध लागू असावेत या बद्दल स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेऊ शकते.
- स्थानिक प्रशासन निर्बंधांबाबत तसेच पर्यटन स्थळांना सुरु ठेवण्याची मुभा देऊ शकते.
- आठवडी बाजार उघडण्याची परवानगीही स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन देऊ शकते.
- राज्य शासनाच्या आदेशात उल्लेखित नसलेल्या कार्यक्रम व गोष्टींबाबतही स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन निर्णय घेऊ शकते.