मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेशाला पालकांचा अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी यंदा पालकांना आरटीई प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यंदा राज्यातून आरटीई प्रवेशाला २ लाख ८५ हजार ३२२ अर्ज आले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६२ हजार जास्त अर्ज आले आहेत. राज्यातील सिंधुदुर्ग व पालघर जिल्हा वगळता उपलब्ध जागांपेक्षा दुप्पट अर्ज आले आहेत. त्यामुळे हे दोन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये यंदा प्रवेशासाठी अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० मार्चला संपली. राज्यातील ९ हजार ८८ शाळांतील १ लाख २ हजार २२ जागांसाठी राज्यातून २ लाख ८५ हजार ३२२ इतके अर्ज आले आहेत. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ६३ हजार २९२ इतके अर्ज आले आहेत. त्याखालोखाल नागपूरमधून ३१ हजार ५१८, ठाणे २५,७०२, औरंगाबाद १७,४७६, नाशिक १६,६६८ आणि मुंबई १५,६५९ या जिल्ह्यांमधून सर्वाधिक अर्ज आले आहेत. आरटीई प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जागांपेक्षा दुप्पटीने अर्ज आले आहेत. मात्र सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध जागांपेक्षा फारच कमी अर्ज आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी १९३ अर्ज आले असून, आरटीई प्रवेशाच्या २९३ जागा आहेत. त्याचप्रमाणे पालघरमध्ये आरटीई प्रवेशासाठी ४८६३ जागा असताना २७५५ इतकेच अर्ज आले आहेत.
जिल्हानिहाय आलेले अर्ज
- पुणे – ६३,२९२
- नागपूर – ३१,५१८
- ठाणे – २५,७०२
- औरंगाबाद – १७,४७६
- नाशिक – १६,६६८
- मुंबई – १५,६५९