मुंबई :
सलग दोन वर्षे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिशन स्कूल ट्रस्टीज असोसिएशन(मेस्टा)कडून करण्यात आली होती तसेच सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्हाला शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागात मेस्टाशी संलग्न असलेल्या १३ हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असल्याची माहिती मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याच्या मागणीवर ठाम असलेले मेस्टाने संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सोमवारी १७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना केली होत्या. त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागामध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या जवळपास १३ हजार शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र शहरी भागातील शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टंसिंग राखणे महत्त्वाचा आहे. त्यामुळे शहरी भागांमध्ये शाळा सुरू करणे सध्यातरी शक्य नसले तरी परीक्षा संपल्यावर लगेचच शहरी भागातील आठवी ते नववीचे वर्ग सुरू करण्यात येतील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिली. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरवण्यात काहीच अडचण नाही, असेही तायडे पाटील यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दखल
मेस्टाच्या कामाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरु झाल्या पाहिजेत, असे सरकारला दूरध्वनीवरून कळवल्याचे तायडे पाटील यांनी सांगितले.