मुंबई :
जनतेसाठी पदपथ अर्थातच ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेत महाराष्ट्रातील चार शहरांनी बाजी मारली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या ११ विजेत्यांमध्ये वाहन केंद्री रस्ते नागरिक केंद्री बनवल्याबद्दल महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांचा गौरव करण्यात आला आहे. पहिल्या फेरीसाठी देशभरातून ३८ शहरांचे प्रस्ताव दाखल आले होते.
शहरांतील वाहनकेंद्री रस्त्यांचे लोककेंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या ३८ अर्जांमधून परीक्षकांनी ११ शहरांची निवड केली. निवड झालेल्या या शहरांना केंद्रीय मंत्रालयातर्फे प्रत्येकी ५० लाखांचे पारितोषिकही दिले जाणार आहे. केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धेच्या दुसर्या सत्राची घोषणा केली आहे. पहिल्या फेरीतील विजेते वगळता कोणतीही स्मार्ट शहरे, राजधानीची शहरे किंवा ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे सहभागी होऊ शकतात.
महाराष्ट्रातील निवड झालेली शहरे
पुणे :
रस्त्यांच्या बाजूच्या मोकळ्या जागांमध्ये नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, संगीत सत्र व हास्यवर्गांचे आयोजन, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा बनवणे असे अनेक नवे उपक्रम त्यांनी रस्त्यांच्या आसपासच्या जागेत राबवले.
पिंपरी-चिंचवड :
रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणार्या हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून प्रायोगिक तत्त्वावर सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती केली. नागरिकांना सायकल चालवणे आणि चालणे हे सुलभ करण्यासाठी सुधारणा केल्या.
औरंगाबाद :
वाहनांऐवजी रस्त्यांचा वापर नागरिकांना मुक्तपणे करता यावा यासाठी सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणले. रस्ते सुशोभित करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. चालणार्या आणि सायकल चालविणार्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय केली.
नागपूर :
सीताबर्डी आणि साक्कदरा या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. रस्त्यांलगत विविध चित्रे, बसण्यासाठी जुन्या टायरचा वापर, टाकाऊ वस्तूंपासून पदपथांची सीमा आखणे यासारखे उपक्रम राबवले.