Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

महाराष्ट्राच्या भोर तालुक्याने प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे नवे मापदंड रचले

banner

नवी दिल्ली :

पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील ससेवाडी ग्रामपंचायतीने समूह पातळीवर कमी खर्चाच्या आणि नवोन्मेषी, पद्धतीने प्लास्टिक निर्मुलन करून परिसर स्वच्छतेच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचा (PWM) चांगला पायंडा पाडला आहे. या पथदर्शी प्रकल्पात ससेवाडी, शिंदेवाडी, वेळू आणि कसुर्डी या चार ग्रामपंचायतींची निवड केली होती. या सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दींत अनेक लघु उद्योग तसेच अनेक हॉटेल्स आणि उपहारगृहे आहेत. यामुळे या भागात फिरती लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या (SBM-G) दुसर्‍या टप्प्यात, हागणदारी मुक्त गाव श्रेणीतील प्लस दर्जा मिळविण्यासाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन एक महत्वाचा भाग आहे. तसेच मार्गदर्शक सूचनांनुसार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही तालुका व जिल्ह्याची जबाबदारी असून, याचे पालन करत भोरचे गट विकास अधिकारी व्ही. जी. तनपुरे यांनी समूह स्तरावर मुंबई-बंगळूरू महामार्गालगत पुण्याजवळ असलेल्या खेड्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पद्धत तयार केली.

असे होते प्लास्टिक कचर्‍याचे व्यवस्थापन

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि गरज तसेच उघड्यावर शौचाच्या पद्धतीपासून मुक्त होण्याचा ओडीएफ प्लस हा दर्जा मिळवण्याशी त्याचा असलेला संबंध समजावून सांगण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बैठका घेण्यात आल्या. प्लॅस्टिकमुक्ती आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी, प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणार्‍या खाजगी कंपनीशी करार करण्याचा निर्णय घेतला. ही कंपनी प्लॅस्टिक जमा करुन त्यावर प्रक्रिया करुन त्यातून एक प्रकारचे कच्चे तेल तयार करते. हे कच्चे तेल, उद्योगक्षेत्रातील बर्नरसाठी वंगण म्हणून वापरले जाते. ज्या कंपनीची अखेर निवड करण्यात आली, तिचा गावापासून एक किमीच्या परिसरात प्रकल्प होता. ज्यामुळे प्लॅस्टिक कचर्‍याची वाहतूक करणे सुलभ झाले आणि खर्चाचीही बचत झाली. ही कंपनी प्लॅस्टिकचा कचरा ८ रुपये प्रती किलो या दराने विकत घेते. प्लॅस्टिक विकून आलेला पैसा या व्यवस्थेची देखभाल आणि कार्यान्वयन यासाठीच वापरला जातो.

ससेवाडी गावातील प्लॅस्टिक मुक्ती अभियान

ससेवाडी गाव हे पहिलेच असे गाव आहे, जिथे कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि वाहतूक करण्याची एक योग्य व्यवस्था आहे. विशेष म्हणजे, उपलब्ध संसाधानांचा जास्तीत जास्त वापर करूनच, ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. सुरुवातीला, त्यांनी त्यांच्या गांडूळ खत प्रकल्पातच थोडीशी जागा तयार करुन, तिथे गावातून जमा केलेला प्लॅस्टिक कचरा संकलित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एका स्वच्छता कामगाराची नेमणूक करुन, कचर्‍याची वर्गवारी करणे आणि दुसर्‍या कामगारांमार्फत कचरा कंपनीत पाठवण्याची व्यवस्था केली गेली. लोकांकडून सुरुवातीला कचर्‍याचे वर्गीकरण योग्य प्रकारे केले जात नसे. मात्र, त्यासाठी वारंवार लोकांशी संवाद साधून, सर्वच घरात ओला आणि सुका कचरा अशी वर्गवारी योग्य प्रकारे केली जाईल, याची व्यवस्था केली. त्यानंतर लोकांनीही यावर गांभीर्याने प्रतिसाद दिला.

प्लास्टिक कचरा प्रक्रियेमुळे झाले हे लाभ

प्लॅस्टिक प्रक्रिया विभागामुळे दोन महत्त्वाचे लाभ झाले आहेत. एक तर, यात प्रक्रिया करण्यासाठी सर्व प्रकारचे प्लॅस्टिक वापरले जाते. त्याशिवाय, या प्रक्रियेतून निघणारा धूर, कोळसा किंवा तेल आणि वायू ही काहीही पर्यावरणासाठी घातक नाही. उलटपक्षी, या कच्च्या तेलाच्या उत्पादनावेळी निघणारा वायू हा प्रकल्पाच्या उपकरणाला वीज पुरवण्यासाठी वापरला जातो. त्याशिवाय त्यातून होणारे उत्सर्जन महाराष्ट्र पर्यटन नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या मानकांपेक्षा कमीच असते.

Related posts

मुंबई महापालिका निवडणुकीत ’महिला राज’; महिला नगरसेवकांची संख्या १२० च्या पुढे जाणार

दास नवमीच्या मुहूर्तावर ‘रघुवीर’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

मोना डार्लिंगच्या प्रवासाला तांत्रिक बिघाडाचा फटका

Leave a Comment