मुंबई
तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आलेली आरोग्य विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली. मात्र त्याचदिवशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार होती. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी बुधवारी राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटीच्या परीक्षेची तारीख बदलण्यात आली. नव्या वेळापत्रकानुसार टीईटीची परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून राज्यात ३ लाख ३० हजार ६४२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
राज्यात ३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गासाठीच्या परीक्षा जाहीर करण्यात आली. टीईटीच्या तुलनेत आरोग्य विभागाची परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी आणि राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत टीईटी परीक्षा ३1 ऑक्टोबरऐवजी 30 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना येत्या काळातील शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.