मुंबई :
राज्यातील पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात घेण्यात याव्यात. तसेच या परीक्षांचा निकाल मे महिन्यांमध्ये जाहीर करण्यात यावा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना दिल्या आहेत. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शाळांनी परीक्षेची तयारी केली असून, विद्यार्थ्यांची उजळणीही सुरू केली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा या साधारणपणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच सुरू होतात. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या दहावी आणि बारावीचा पेपर नसेल त्या दिवशी नववी आणि अकरावीची परीक्षा घेण्यात येत आहे. तर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ एप्रिलपासून घेण्याची तयारी शाळा व मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची उजळणी सध्या सुरू असून, अनेक शाळांकडून परीक्षेचे पेपरही तयार केले असून, पुढील काही दिवसांमध्ये त्यांची छपाई सुद्धा होईल, असे असताना २४ मार्चला शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात घेण्यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरून शिक्षण क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या इयत्ता नववीच्या परीक्षा सध्या सुरू असल्याने एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात परीक्षा घेण्याची सूचना रद्द करावी. अशी प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
साधारणतः 15 एप्रिल पर्यंत शाळांचे मुल्यमापनाचे काम संपवून नंतर ३० एप्रिल पर्यंत निकाल पूर्ण करून घोषित करतात आणि पुढील वर्षाच्या नियोजनासाठी २/३ दिवस राखून ठेवतात. सध्या 10 वी 12 वी च्या परीक्षा सुरू असल्याने शाळा पूर्ण वेळ व पूर्ण क्षमतेने सुरू करणे अशक्य आहे. तसेच परीक्षा सुरू असून उलट सुलट परिपत्रके निर्गमित न करता वेळे अगोदर व योग्य वेळेस योग्य परिपत्रके निर्गमित करावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.
राज्यामध्ये १ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर होते. त्यामुळे अनेक पालकांकडून गावाला जाण्याचे गाड्यांचे आरक्षण झालेले आहे. त्यामुळे परीक्षा एप्रिलच्या तिसर्या आठवड्यात घेतल्यास त्याचा परिणाम आरक्षणाच्या तिकिटावर होऊन पालकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याचा अधिकार शाळांना देऊन त्यांनी केलेल्या नियोजनानुसार परीक्षा घेऊन एप्रिल महिन्याच्या शेवटी निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.
रविवारीही शाळा सुरू राहणार
दहावी, बारावीच्या परीक्षांमुळे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता १ली ते ९वी आणि इयत्ता ११ वीचे वर्ग असणार्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याचप्रमाणे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारीही पूर्णवेळ शाळा सुरू ठेऊन रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवण्याच्या सूचनाही शाळा प्रशासनांना दिल्या आहेत.