मुंंबई :
केईएम रुग्णालयात मृतदेहांची शवचिकित्सा ही सकाळी ९ ते सायंकाळी ९ दरम्यानच करण्यात येत होती. त्यामुळे अनेकदा नातेवाईकांना मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने त्यांची अडचण होत होती. त्यामुळे केईएम रुग्णालयातील शवागृह २४ तास सुरू ठेवण्याची नागरिकांकडून मागणी होत होती. याची दखल घेत अखेर प्रशासनाने शवागृह २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नातेवाईकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा मृतदेह मिळण्यातील अडचण दूर होणार आहे.
केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान किंवा अपघातात काही रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांची शवचिकित्सा केली जाते. मात्र केईएम रुग्णालयातील शवागृह हे सकाळी ९ ते सायंकाळी ९ दरम्यान सुरू असल्याने नातेवाईकांना मृतदेह मिळण्यास वेळ लागतो. या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक सचिन पडवळ व अनिल कोकीळ यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. याबाबत केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. त्याच झालेल्या बैठकीत न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख (प्रभारी) डॉ. रवींद्र देवकर देखील उपस्थित होते. या बैठकीत शवविच्छेदनाच्या अडचणी, कक्षातील पायाभूत सुविधा, कर्मचार्यांच्या रिक्त पदे, शवागृहाची वेळ वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यात शवागृहाची वेळ वाढवून तो आता २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. यात स्पेशल केसेसचे शवविच्छेदन करण्यात येणार नसून त्याची वेळ केवळ सकाळी ९ सायंकाळी ६ अशी असणार असल्याचे केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आली. तसेच अन्य प्रश्नांवरही रुग्णालय प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली.