Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

banner

मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बारावी व दहावीसाठी उपलब्ध असलेल्या ८ हजार केंद्र व उपकेंद्रांची संख्या २२ हजार ९६९ करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध केल्या असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची विद्यार्थी व पालकांकडून मागणी होत होती. मात्र राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही परीक्षा देता यावी यासाठी राज्य मंडळाने परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘शाळा तेथे केंद्र’ ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्यायची असल्याने ‘शाळा तेथे केद्र’ यासाठी परीक्षेच्या नियोजनात झालेल्या बदलामुळे बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी २२ हजार ९६९ इतकी अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी २९४३ केंद्रांची आवश्यकता लागत असते. मात्र ‘शाळा तेथे केंद्र’ या नियमानुसार बारावीच्या परीक्षांसाठी ९६१३ इतकी केंद्र व उपकेंद्राची वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे दहावीसाठीही ५०४२ केंद्रांची आवश्यकता असताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २१ हजार ३४९ इतक्या केंद्र व उपकेंद्रांचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.

१५ विद्यार्थ्यांसाठी केंद्र
विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन १५ किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्यात आले आहेत. यावर्षी ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन केले असून, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

परीक्षेसाठी वाढीव वेळ
विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीसाठी किमान ४० टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे.

Related posts

कळवा रुग्णालयात मंगळवारी दोन लहान मुलांचा मृत्यू

एसएनडीटीकडून ट्रॅव्हल, टुरिझमच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सुरूवात

सीईटीला मुकलेल्या विद्यार्थ्यांची २७ ऑगस्टला होणार पुनर्परीक्षा

Leave a Comment