मुंबई :
अनेक वर्षांपासून प्रलंबित गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने सोडविला आहे. नुकतीच या प्रकल्पाची निविदा प्रकाशित केली आहे. याच धर्तीवर आता विक्रोळीतील टागोर नगर, कन्नमवार नगर मधील फक्त एका इमारतीला पुनर्विकासासाठी मान्यता न देता सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्याच्या सूचना गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा प्रशासनाला दिल्या.
हे पण वाचा :कोंकण मंडळाच्या ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुमारे ३३ हजार परवडणारी घरे उपलब्ध होतील. या प्रकल्पानुसार फक्त एका इमारतीला पुनर्विकासासाठी मान्यता न देता सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा एकत्रित आराखडा तयार येणार आहे. यामुळे वसाहतींचे सुटसुटीत नियोजन करून पायाभूत सुविधांवरील ताण कमी करता येईल, असेही आव्हाड यांनी सांगितले. प्री फॅब तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी कालावधीत अधिकाधिक घरांची निर्मिती करावी अशा सूचना डॉ. आव्हाड यांनी केल्या. कोकण विभागाच्या गृहनिर्माण प्रकल्पाची आव्हाड यांच्या हस्ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
कोविड साथरोग व त्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे हक्काचे घर असावे ही संकल्पना नागरीकांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कमीत कमी कालावधीत परवडणाऱ्या दरात गृहनिर्मिती करण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे. म्हाडा हे आव्हान नक्की स्वीकारेल व सक्षमतेने पेलेल, असा आशावाद डॉ. आव्हाड यांनी व्यक्त केला.
गाव तेथे म्हाडा
म्हाडावरील या विश्वासामुळे ‘गाव तिथे म्हाडा’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. तळीये (जि. रायगड) या पूरग्रस्त गावाचे पुनर्वसन सामाजिक बांधिलकी म्हणून म्हाडातर्फे केले जाणार आहे. या गावातील ग्रामस्थांसाठी ६०० चौरस फुटाची २६१ घरे म्हाडा लवकरच उभारणार आहे, असे डॉ. आव्हाड यांनी सांगितले.
वरळी बीडीडी चाळीचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला वेग आला असून महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी सदर इमारतींच्या १४ मजल्याचे काम पूर्ण होईल, असे डॉ.आव्हाड यांनी सांगितले.