मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून बाहेर पडलेल्या नेत्यांकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद ही केवळ केंद्रीय निवडणूक आयोग तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारी होती. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कधीही एनडीएला समर्थन करण्याचे पत्र दिलेले नाही. नागालँडमध्ये स्थापन करण्यात आलेल्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यात आला होता. परंतु नागालँडमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहे का ? असा प्रश्न देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या मनात NDA सोबत जाण्याचे त्यांच्या मनात आधीपासूनच होते. त्यामुळेच त्यांना NDA स्वप्नातही दिसत असेल असा टोला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, सध्याचे नागालँडचे मुख्यमंत्री यांच्या पक्षाने भाजप विरोधात निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर भाजपने विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला समर्थन देत सत्तेत सहभागी झाले. बंडखोरी केलेल्या नेत्यांजवळ जर NDA सोबत जायचे पत्र असेल तर त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवायला पाहिजे होो, संपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी पत्र दाखवले नाही. उद्या पुन्हा यावर आणखी खुलासा करणार असे देखील आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार यांनी एबी फॉर्म दिल्यानंतर ते प्रचाराला लागल्यानंतर आमदार निवडून आले आहे. या पक्षाचा जन्मदाता शरद पवार आहेत. देशातील आणि राज्यातील सर्वसाधारण जनतेला यांचे वागणे कळत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणतात की शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या प्रकरणाशी संबंध नाही. आमचे प्रकरण वेगळ आहे. पण पटकथा, दिग्दर्शक, निर्माते एकच आहेत. बदलल ते फक्त कलाकार असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची वैधानीक बाजू सारखीच आहे. शिवसेनेच्या निकालात देखील म्हणूनच व्हिप अजय चौधरी यांना मान्यता मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचाही अहवाल यावेळी आव्हाड यांनी दिला आहे. प्रफुल पटेल कोणत्या ईश्वराकडे प्रार्थना करतात ते मला माहित नाही. आमचा विठठ्ल सगळ्यांना सांभाळून घेत आहे. त्यांना असे वागण्याचा नैतिक अधिकार आहे का? शरद पवारांचे मतपरिवर्तन करण्याची भाषा ते करताहेत परंतु एका आई वडिलांना सोडून दुसऱ्याकडे जाणारे शरद पवार नाहीत. ज्यांना पवारांनी सगळं दिल तेच आज त्यांचे पाय कापायला बघतायेत आहे. असे देखील यावेळी आव्हाड यांनी म्हटले
देशात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचे काम सातत्याने सुरू आहे. देशातील आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात काही बोलल्यास तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पत्रकारांना कणा नाही अस समजणारी लोक सध्या देशात आणि राज्यातील राजकारणात सत्तेत आहेत. मात्र भाजपने महाराष्ट्रातील पत्रकारांना ओळखले नाही. ते कधीही लाचारी पत्करणार नाही तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकारांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजेत असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भारतातल्या पत्रकारांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनाही सोडले नाही. पत्रकारांनी अनेक वेळा त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमाने सरकारांला जेरीस आणल आहे. मात्र त्यावेळी राज्यकर्त्यांनी कधीही पत्रकारांची गळचिप्पी केली नाही. त्यांना लिखानाचे स्वातंत्र्य दिले होते. मात्र सध्याच्या देशातील आणि राज्यातील भाजप सरकारने देशातील अनेक पत्रकारांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. त्रिपुरात एका पत्रकाराला २ वर्ष जेलमध्ये डांबले गुजरातमध्ये देखील एकाला सहा महिने डांबण्यात आले. असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.