मुंबई :
मुबंईतील नागरिक काही दिवसांपासून थंडीचा आनंद घेत आहेत. मात्र काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषित होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील प्रदूषणाची पातळी २६२ एक्यूआय इतकी नोंदवण्यात आली असून, हा हवेचा स्तर ‘वाईट’ म्हणून नोंदवला जातो. त्याचप्रमाणे मुंबईतील माझगाव आणि कुलाब्याही हवेचा निर्देशांक सर्वात वाईट नोंदवण्यात आला असून, त्याने दिल्लीलाही मागे टाकले आहे.
वातावरणातील गारवा वाढू लागल्याने अनेकजण सकाळी स्वच्छ हवेचा आनंद घेण्यासाठी घरातून बाहेर पडत आहेत. मात्र ते स्वच्छ हवा घेण्याऐवजी अशुद्ध हवा जास्त घेत आहेत. सफरने शुक्रवारी दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३१९ एवढा नोंदवला आहे. तर मुंबईतील २६२ एक्यूआय इतकी नोंद केला आहे. यामध्ये दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि माझगावने दिल्लीलाही मागे टाकले आहे. माझगावचा एक्यूआय ३५८ आणि कुलाब्याचा एक्यूआय ३४६ इतका नोंदवला आहे. त्याचबरोबर मालाड आणि बीकेसीमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे २४२ आणि १८१ नोंदवला गेला. भांडुप १५६ ,वरळी १५९, बोरिवली १०६ ,चेंबूर २२८, अंधेरी २६६ इतका हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला आहे. मुंबईतील कोणत्याही परिसरतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम किंवा समाधानकारक नोंदवला गेलेला नाही.
पावसाळ्यानंतर जमिनिकडून समुद्राकडे वाहणार्या वार्यांचा वेग मंदावल्याने धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगत आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील स्वच्छ हवामान आता बदलू लागले असून, प्रदूषणाच्या पातळी वाढ होत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकही वाईट पातळीपर्यंत पोहोचला आहे.