शहर

Sharad Pawar : मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही पक्षाची भूमिका – शरद पवार

छत्रपती संभाजीनगर :

राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते एक, दोन हप्ते महिलांना दिले जातील. त्यानंतर दिला जाणार का? हा प्रश्न आहे. सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे. शिवाय आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन समाजात दरी निर्माण होते की काय असे चित्र आहे. विशेषतः मराठवाड्याच्या दोन ते तीन जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. याप्रकरणी चर्चा आणि संवाद होणे महत्वाचे असल्याने सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलावले पाहिजे असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले की, आरक्षणावर मतभेद नाही. काही गोष्टी अशा आहेत की मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे. दोन वर्गात अंतर वाढतं की काय अशी स्थिती मला दिसते. मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यात याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं. मला काही सहकाऱ्यांनी सांगितलं की, अनेक ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल अमूक समाजाच्या व्यक्तीचं असेल तर दुसऱ्या समाजाची व्यक्ती तिथे जात नाही. हे खरं असेल तर ते चिंताजनक आहे. ही स्थिती बदलली पाहिजे. त्यासाठी आमच्यासारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, उद्या निवडणुका, संसदेचं अधिवेशन संपल्यावर आम्ही याबाबतचा संवाद साधण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागेल. आज मराठवाड्यात जो वाद निर्माण झाला आहे. त्या संदर्भात आम्ही नव्या पिढीशी संवाद साधणार आहोत. ते काम आम्ही करणार आहोत, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर शरद पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले, तिजोरीत काही नाहीये. या सर्व घोषणा आहे. निवडणुकीच्यावेळी एखादा दुसरा हप्ता दिला जाईल. तो देऊन जनमानस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसतो. पण लोकांमध्ये ही चर्चा आहे की, हे निवडणुकीच्या पूर्वीच देतील. या पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही तरी परिणाम होईल, असेही शरद पवार म्हणाले.

संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटपात तडजोडीसाठी जी समिती नियुक्त करण्यात येणार आहे त्यात शिवसेनकडून संजय राऊत यांनी तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी नावं दिली आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावं दिली आहेत. याबाबत १२ ताररेखनंतर बैठक होईल. काही झालं तरी एकवाक्यता ठेवायची, जागांबाबत निर्णय घ्यायचा आणि लोकांना पर्याय द्यायचा असं तिन्ही पक्षांचं ठरलं आहे, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभेत आम्ही एकसंघ राहिलो. लोकांना पर्याय दिला. त्याच पद्धतीने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याला आता मूर्त स्वरुप आले पाहिजे. असे जर घडले तर लोकसभेसारखीच स्थिती दिसून येईल. नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल परंतु, लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही. सर्व एकत्र आले तर ठीक अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल असेही शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *