शहर

मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन 

मुंबई : 

महाराष्ट्र राज्यात होणार असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी ०६ ऑगस्ट २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ हा कालावधी निश्चित केला आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. यामध्ये मतदारांनी मतदार यादीतील आपल्या नावासोबत स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडून घेण्याची संधी मिळणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपले मोबाईल क्रमांक मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडून घ्यावे,असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.

नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचे फायदे

निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी विविध सूचना आणि माहिती पाठविली जाते. त्यामध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, मतदानाची वेळ इत्यादी महत्त्वाची माहिती या बाबी समाविष्ट असतात. मतदानाच्या दिवशी आपला वेळ वाचवण्यासोबतच, विनासायास मताधिकार बजावण्यासाठी ही माहिती कामी येते. त्यामुळे मतदार यादीत आपला मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि निर्देशांची माहिती मतदारांना सुलभतेने प्राप्त होते. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवले जाणारे मतदार सर्वेक्षणासारखे उपक्रम, मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्या संदर्भातील अर्जावरील कार्यवाही याबाबतच्या सूचना – नोटीसा, पंचनाम्याची सूचना (असेल तर) प्राप्त होते, आणि संभाव्य कार्यवाही सुलभ होते. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाद्वारे तसेच Voter Helpline ॲपद्वारे मतदार यादीतील आपल्या नावाचा सुलभतेने शोध घेता येतो. त्यासोबतच मतदारांना आपले ई – मतदार ओळखपत्र ही सहजतेने डाऊनलोड करता येते.

एक मोबाईल क्रमांक एकाच मतदाराच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक

देशात मोबाईलचा वापर सुरू झाल्याच्या सुरुवातीच्या काळात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या अत्यंत नगण्य होती. त्यामुळेच याआधी नोंदणी झालेल्या बहुतांश मतदार ओळखपत्रधारकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या नावासोबत जोडलेले नाहीत. यासोबतच ऑनलाईन पद्धतीत एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून एकापेक्षा अधिक जणांचे मतदार नोंदणी अर्ज भरले जातात. अशावेळी सदर मोबाईल क्रमांक हा विशिष्ट मतदारापुरताच मर्यादीत नसल्याने तो कोणाही मतदाराच्या नावासोबत त्याचा विशिष्ट म्हणजेच युनिक मोबाईल क्रमांक म्हणून जोडला जात नाही. हे टाळण्यासाठी एका मोबाइल क्रमांकाचा वापर फक्त एकाच मतदार ओळखपत्रासाठी केला जावा. त्यामुळे विद्यमान मतदारांसह ज्यांच्या मतदार यादीतील नावासोबत त्यांचा विशिष्ट, अर्थात युनिक मोबाईल क्रमांक जोडलेला नाही, त्यांनी अर्ज क्र. ८ भरून आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेणे मतदारांच्या हिताचे आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्यासाठीचे पर्याय

१) नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना-
नव मतदार नोंदणीचा अर्ज भरताना आपल्याला अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचवेळी आपण इतर कोणत्याही मतदार ओळखपत्रासाठी वापरला न गेलेला असा स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला तर तो मतदार यादीत आपल्या नावासोबत जोडला जातो.

२) विद्यमान नोंदणीकृत मतदारांसाठी अर्ज क्र. ८
भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांकरता असलेल्या अर्ज क्र. ८ मध्ये मतदार यादीतील वैयक्तिक तपशीलांमधील बदल, दुरुस्त्या आणि अद्ययावतीकरणा अंतर्गत मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय दिला आहे. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने भरता येतो.
ऑनलाईन अर्ज भरण्याकरता voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline हे मोबाईल अॅप वापरता येते. या संकेतस्थळावर लॉगीन केल्यावर अर्ज क्रमांक ८ निवडून, त्यात ‘Correction of Entries in Electoral Roll’ या सुविधे अंतर्गत, आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडण्याचा पर्याय मिळतो.

ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मतदार जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील. आपण आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि त्यांनाही मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून देण्याची विनंती करू शकता, असे अवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *