
प्रयागराज :
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी सौ. लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केले. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की महाकुंभ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचे केंद्र आहे. प्रयागराज ही पवित्र भूमी आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा हा संगम आहे. या पवित्र संगमस्थळी स्नान केले की जीवनाचे सार्थक होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. १४४ वर्षांनंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहेत. कोट्यवधी लोक येथे येऊन गेलेत मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली. येथे कोणीही लहान मोठे नाही. ५० कोटी लोकांनी कुंभ स्नान केले हा एक विश्वविक्रम आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शिंदे यांनी कौतुक केले.
इथ येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळ्याचे उत्तम नियोजन केले. मागील दीड महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमने महाकुंभ मेळ्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली. आतापर्यंत ६० कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले. अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केले आणि गंगा नदीचे जल घरी घेऊन गेले. गंगेचे पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.