
मुंबई :
भारतातील सर्वात सक्रिय आणि कार्यरत जिल्हा संघटना असा लौकिक असलेल्या बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेला आणि संघटनेशी संलग्नन खेळाडूंना बलशाली बनवण्याचे ध्येय उराशी बाळगणारे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी ७ मार्चला होणार्या मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्या विविध गटातील तीन खेळाडूंना आगामी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पाठीवर कौतुकाची थापच नव्हे तर आर्थिक पाठबळ देण्याचे खानविलकर यांनी आज जाहीर केले आहे. जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रचंड मेहनतीबरोबर विमानप्रवासापासून हॉटेल आणि स्पर्धा फीसारखे अनेक प्रचंड खर्चही उचलावे लागतात. त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेसाठी मुंबई श्री स्पर्धेतील तीन खेळाडूंचे आर्थिक ओझे खुद्द अध्यक्ष उचलणार आहेत.
भारतीय शरीरसौष्ठवाचा कणा असलेल्या मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वदृष्टीने बलशाली बनवण्याचे ध्येय साकारण्यासाठी खानविलकर गेली अनेक वर्षे झटत आहेत. शरीरसौष्ठव हा खेळ सर्वसामान्यांचा आणि होतकरू मुलांचा आहे. शरीरसौष्ठवात मुंबईसारखी अफाट गुणवत्ता अवघ्या हिंदुस्थानात कुठेही नाही. पण जागतिक स्पर्धा म्हटली की आपले असंख्य खेळाडू प्रचंड खर्चाअभावी माघार घेतात आणि खरी गुणवत्ता मागेच राहाते. या गुणवत्तेला पाठबळ देण्यासाठी, पुढे आणण्यासाठी मुंबई श्रीसारखे दुसरे कोणतेही मंच असू शकत नाही. त्यामुळे या स्पर्धेतील विविध गटात जोरदार कामगिरी करणार्या तीन खेळाडूंना येत्या १४ ते १८ जूनदरम्यान युएईमध्ये होत असलेल्या आगामी आशियाई स्पर्धेत आर्थिक पाठबळ देणार असल्याचे खानविलकरांनी जाहीर केले. फक्त ते तीन गुणवत्ता असलेले पीळदार खेळाडू कोण असतील, हे मुंबई श्रीदरम्यानच कळेल. त्यांची निवड संघटना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह राज्य संघटनेची सुत्रे स्वीकारल्यानंतर खानविलकरांनी आघाडीच्या शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्टया श्रीमंत करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. आमचे ध्येय खडतर आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वासही खानविलकरांनी याप्रसंगी बोलून दाखविला. या ध्येयमुळेच खेळाडूंना जास्त रकमांची रोख पुरस्कार देण्याचे आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंना लागणारे पूर्ण सहकार्य करण्यासाठी संघटना आणि मी स्वता कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.