
मुंबई :
मागील बऱ्याच दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या मराठी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खऱ्या अर्थाने चित्रपटाची तोंडओळख करून देणाऱ्या टिझरमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’मध्ये काय पाहायला मिळणार याची झलक दिसते. प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या टिझरमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’च्या टिझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ११ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
फटमार फिल्म्सच्या सहयोगाने हेमंत चव्हाण, प्रद्योत पेंढरकर आणि निखिल मगर यांच्या सिक्स पर्पल हार्टसची प्रस्तुती असलेल्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या आगामी चित्रपटाची निर्मिती नेहा गुप्ता आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते विजय नारायण गवंडे आणि श्रीकांत देसाई आहेत. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट या माध्यमाची उत्तम जाण असणाऱ्या या दिग्दर्शक द्वयींनी पुन्हा एकदा एक वेगळा आणि अनोखा विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटाचे शीर्षक उत्सुकता निर्माण करणारे असून, प्रदर्शित झालेल्या टिझरने त्यात आणखी भर टाकण्याचे काम केले आहे. कोणतीही व्यक्तिरेखा अगदी सहजपणे साकारण्याची हातोटी असलेले अभिनेते गिरीश कुलकर्णी काॅलेजमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा विभाग सुरू करतात असे टिझरच्या सुरुवातीला पाहायला मिळते. त्यावर सयाजी शिंदे यांची आश्चर्यकारक प्रतिक्रिया उमटते आणि इथूनच ‘पावटॉलॉजी’ म्हणजे नेमके काय याबाबतची चर्चा सुरू होते. धूम स्टाईलने चालवल्या जाणाऱ्या बाईक्स, त्यावर मारलेली विली, काॅलेजमधील धमाल-मस्ती, सुमधूर गीत-संगीत, डान्स, टशन असा एकच कल्ला करत उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा चित्रपट येणार असल्याची चाहूल देणारा हा टिझर आहे. या चित्रपटात राजकारण, शिक्षण व्यवस्था आणि समाजकारण याचा मेळ घालण्यात आल्याचेही टिझर पाहिल्यावर सहजपणे जाणवते. नाविन्यपूर्ण विषय, शिक्षणाचे महत्त्व सांगणारा आशय, सुरेख सादरीकरण, सुमधुर गीत-संगीत, आशयघन कथानक, दमदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमुल्ये अशी या चित्रपटाची विविध वैशिष्ट्ये आहेत.
सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी या मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन तगड्या अभिनेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, अपूर्वा चौधरी, प्रगल्भा कोळेकर, कृतिका देव, हरीश थोरात, सुयश झुंजुरके, छाया कदम, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. कथा संतोष शिंत्रे यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शनासोबतच पटकथा, संवाद आणि गीतलेखनसुद्धा प्रसाद नामजोशी यांनीच केले आहे. या चित्रपटातील गीतांना सुमधुर संगीत देण्याचे काम संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी केले असून, ध्वनी आरेखन मंदार कमलापूरकर यांनी केले आहे. सागर वंजारी यांनी दिग्दर्शनासोबतच कार्यकारी निर्माता आणि संकलन करत तिहेरी भूमिका बजावली आहे. निलेश गोरक्षे यांचे कल्पक कला दिग्दर्शन लक्ष वेधणारे असून, अमिन काझी यांचे व्हीएफएक्सही नावीन्यपूर्ण आहेत. छायांकन गिरीश जांभळीकर यांनी केले असून, वेशभूषा रश्मी रोडे यांनी, तर रंगभूषा श्रीकांत देसाई यांनी केली आहे. प्रशांत गाडे आणि सुमित कुलकर्णी यांनी निर्मितीव्यवस्था सांभाळली आहे.