
मुंबई :
उद्योन्मुख आणि प्रगत क्षेत्रासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड एआयची (रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे या सेंटरची स्थापना होणार आहे. नुकताच मुंबई विद्यापीठ आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने रोबोटिक्स सिस्टम, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत एप्लीकेशन्स, विद्यार्थी आणि संशोधकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रकल्पांवर काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक रोबोटिक प्रणालींसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला ‘एमटेक इन रोबोटिक्स’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथील विस्तीर्ण केंद्रातील सुमारे ४५ हजार चौरस फुटावर हे सेंटर तयार केले जाणार आहे. हे केंद्र रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक ऑटोमेशनमधील संशोधन, विकास आणि प्रशिक्षणासाठी केंद्र म्हणून काम करेल. उद्योन्मुख आणि प्रगत क्षेत्रातील गरजा आणि औद्योगिक आव्हानांवर मात करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी संशोधनास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील कौशल्ये वृद्धीसाठी या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. कराराच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ आणि जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्या माध्यमातून तरुण अभियंते आणि विद्यमान औद्योगिक कर्मचार्यांना कौशल्ये देण्यासाठी संयुक्तपणे प्रमाणित रोबोटिक्स प्रोग्रामिंग/ऑपरेटर प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. जॅन्युटेक इंडस्ट्रीच्या माध्यमातून औद्योगिक गरजा, आव्हाने आणि संशोधन विषयावर काम केले जाणार तर मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक कौशल्य आणि संशोधन प्रतिभा यासाठी योगदान देण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लायड सायन्सेस कल्याण येथे स्थापन होत असलेल्या या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगत शिक्षण आणि संशोधनाला नवीन दिशा मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच या केंद्राच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांसाठी संशोधन आणि विकासाच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून त्यांच्यात आधुनिक रोबोटिक प्रणालींवर काम करण्याची क्षमता आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास ते सक्षम होऊ शकतील असेही त्यांनी सांगितले.