
महाराष्ट्रातील विधानसभा (Election) निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत.
आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत दर तासाला सरासरी 58 लाख मतदारांनी मतदान केले. तथापि, शेवटच्या दोन तासांत अपेक्षित 116 लाखांच्या तुलनेत केवळ 65 लाख मतदारांनी मतदान केले, हे लक्षवेधी असले तरी त्यावरून कोणत्याही गैरप्रकाराचा निष्कर्ष काढता येत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.
प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून मतदानानंतर कोणतीही तक्रार अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निरीक्षकांकडे नोंदवण्यात आलेली नाही.
मतदार यादी संदर्भात आयोगाने सांगितले की, 1950 च्या लोकप्रतिनिधी अधिनियम व 1960 च्या मतदार नोंदणी नियमांनुसार तयार केली जाते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि अंतिम यादी सर्व पक्षांना उपलब्ध यादी करून दिली जाते.
याशिवाय, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ 90 अपीले करण्यात आली, जी एकूण मतदार संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडूनही कोणतीही मोठी तक्रार नोंदवलेली नाही.
पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत आणणार
मतदान प्रक्रियेत 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर 97,325 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व सर्व पक्षांकडून 1,03,727 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमले गेले होते. यामध्ये काँग्रेसच्या 27,099 बीएलएचा समावेश होता. त्यामुळे मतदार यादी संदर्भातील आरोप पूर्णपणे निराधार असून कायद्याचा अवमान करणारे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
24 डिसेंबर,2024 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसला लेखी उत्तर दिले असून, ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तरीही पुन्हा पुन्हा असे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे अयोग्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे.