
मुंबई :
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पूर्व पश्चिम जोडणाऱ्या विक्रोळी (Vikhroli Update) पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे तातडीने ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली.
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. या पुलाची लांबी ६१५ मीटर तर रुंदी १२ मीटर इतकी आहे. त्यापैकी पुलाचे ५६५ मीटर लांब इतके पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
या पुलावर १८ तुळया (गर्डर) टाकण्यात आल्या असून, या तुळ्या (गर्डर) सुमारे २५ मेट्रिक टन वजनाच्या आहेत. पुलासाठी वापरण्यात आलेल्या तुळयांची (गर्डर) लांबी २५ ते ३० मीटर इतकी असून, या सर्व तुळ्या (गर्डर) तीन टप्प्यात टाकण्यात आल्या. प्रत्येक टप्प्यात ६ अशाप्रकारे १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत. विक्रोळीच्या पूर्वेला १२ पिलर असून, पश्चिमेकडील बाजून सात पिलर असे एकूण १९ पिलर आहेत. या कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.
किती काम झाले
विक्रोळी रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्व बाजूकडील काम, रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. पश्चिम बाजूकडील चढ – उताराचा मार्गावरील काही काम अद्याप शिल्लक असून, ते ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पश्चिम बाजूला रेल्वे रुळालगत असलेल्या सेंट जोसेफ शाळेजवळ असलेल्या वळणावर काम शिल्लक आहे. त्यावर ‘डेक स्लॅब’ टाकण्यात येणार आहे.
हे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक आहे. शाळा आणि रेल्वे स्थानक जवळ असल्याने अतिशय दक्षता घेत महानगरपालिका या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर संपूर्ण पुलावर ध्वनिरोधक, क्रॅश बॅरियर, कठडे, रंगकाम, कॅट आईज, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, दिशादर्शक फलक ही कामे समांतरपणे पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करता येईल, असे निर्देश बांगर यांनी दिले.
शाडूची मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना विविध परवानग्या वेळेत मिळतील – मुंबई महानगरपालिकाचे आश्वासन
इंधनात होणार बचत
पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर विक्रोळी पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या नगरिकांच्याही इंधनात बचत होणार आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्यांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे. घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या वाहनधारकांनाही या पुलाचा फायदा होणार आहे.