
मुंबई :
दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर आता शिक्षण संचालनालयामार्फत २१ मेपासून राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना दोन दिवस सरावासाठी देण्यात येणार आहेत. राज्यातील ९२८१ महाविद्यालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार १९ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून www.mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सराव सत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना २० मे रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर २१ ते २८ मे पर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. त्यानंतर ३० मे रोजी सकाळी ११ वाजता तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ३० मे ते १ जून रोजी अर्जामध्ये हरकती व दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ५ जून रोजी गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी) करण्यात येणार असून, ६ जून रोजी सकाळी १० वाजता वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. ६ ते १२ जून दरम्यान आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी करून प्रवेश निश्चित करणे. पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. १४ जून रोजी रात्री ११ वाजता दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यभरात २०,४३,२५४ जागा
राज्यात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत तब्बल २०,४३,२५४ जागा आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ८ लाख ५२ हजार २०६ जगा असून, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ तर वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२ जागा आहेत.
महाविद्यालयांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती, नाशिक व छत्रपती संभाजी नगर या महानगरपालिकांमध्ये यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणारी अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या नोंदणी प्रक्रियेनंतर शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ साठी इयत्ता अकरावीसाठी राज्यभरातून एकूण ९२८१ महाविद्यालयांनी यशस्वीरित्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. विभागीय उपसंचालक कार्यालयांमार्फत या नोंदणीची पडताळणी व प्रमाणन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन क्रमांक
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालयांना कोणतीही तांत्रिक अडचण अथवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास, त्यांनी ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
कोट्यातील प्रवेश ६ जून २०२५ पासून सुरू
जे विद्यार्थी कॅप किंवा कोटामार्फत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतात, त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली समजली जाईल. एकदा उमेदवाराने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येईल. नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातूनच स्वीकारला जाईल. सर्व संबंधितांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश ६ जून २०२५ पासून सुरू होतील.
विभागनिहाय महाविद्यालये
विभाग – जागा
अमरावती – १,८६,४७५
छत्रपती संभाजीनगर – २,६६,७५०
कोल्हापूर – १,९३,२७८
लातूर – १,३७,५५०
मुंबई – ४,६१,६४०
नागपूर – २,१४,३९५
नाशिक – २,०७,३२०
पुणे – ३,७५,८४६
एकूण – २०,४३,२५४