
मुंबई :
तांत्रिक अडचणीमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या दिवशी खेळखंडोबा झाला. अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ दिवसभर ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्यातच सायंकाळी उशीरा संकेतस्थळ सुरू झाले तरी त्यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. ही बाब लक्षात घेता अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक २२ मे रोजी दुपारी ३ वाजता शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. तसेच संकेतस्थळ सुरू करण्यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे.
शिक्षण संचालनालयाकडून घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक १ ही १९ मे २०२५ ते १३ जून २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबींच्या तारखा जाहीर केल्या होत्या. २१ मे २०२५ रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम भरणे शक्य झाले नाही. परिणामी विद्यार्थी हित लक्षात घेता व तांत्रिक बाबींची दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक २२ मे २०२५ दुपारी ३ वाजता घोषित करण्यात येणार आहे.
पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल. कोणतीही छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाव्दारे कळविण्यात येईल. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये, असे आवाहन शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.