शिक्षण

अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ ठप्प

मुंबई :

अकरावी प्रवेशाच्या प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारी सकाळी सुरुवात झाली, परंतु संकेतस्थळच बंद असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरताच येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने तातडीने ऑनलाइन अकरावी प्रवेश परीक्षा सुरू केली. १९ व २० मे रोजी विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करण्यात आल्यानंतर २१ मेपासून प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सकाळपासूनच बंद असल्याने विद्यार्थी व पालकांना अर्ज भरण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. सकाळपासून सायबर कॅफे किंवा घरातील संगणकासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. संकेतस्थळावर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर पालक व विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणतेही उत्तर मिळत नव्हते.

मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, यासारख्या काही ठरावीक महानगरपालिकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र या प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षण संचालनालयाचा प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी गोंधळ उडत असे. त्यामुळे राज्यभरातील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्याबाबत शिक्षण तज्ज्ञांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. शिक्षण तज्ज्ञांची ही शंका शिक्षण विभागाकडून पहिल्याच दिवशी रास्त ठरविण्यात आली.

अकरावी प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईलद्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेल वर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल. तसेच विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी २८ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *