
मुंबई :
विरार केंद्र ब संघाचा शाहिद खान आणि कांदिवली केंद्राचा युग असोपा यांनी शतकी खेळी साकारत ३३व्या एलआयसी एमसीए कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा पहिला दिवस गाजवला.
माटुंगा जिमखान्यावर शनिवारी ठाणे केंद्र ब संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर विरार केंद्र ब संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यानंतर शाहिद खानने १२१ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०९ धावा फटकावल्या. त्याला शिवा सिंग (३१) आणि युवराज पाटील (३०) यांनी फलंदाजीत मोलाची साथ दिली. त्यामुळे विरार केंद्र ब संघाला ५८.३ षटकांत सर्वबाद ३०१ धावा करता आल्या. दिवसअखेर ठाणे केंद्र ब संघाने २१ षटकांत ३ बाद ५० धावा केल्या आहेत.
क गटात, कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात कांदिवली केंद्राने प्रथम फलंदाजी करताना शनिवारी युग असोपाच्या नाबाद १२१ धावांच्या खेळीच्या जोरावर ८५ षटकांत ५ बाद २५८ धावा केल्या. असोपाचे हे सलग दुसरे शतक ठरले. त्याने २१२ चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांची बरसात केली.
अन्य सामन्यांत, चेंबूरच्या आरसीएफ मैदानावर घाटकोपर केंद्राविरुद्ध ठाणे केंद्र अ संघाच्या अक्षित सिन्हा याने २२ धावांत ५ विकेट्स टिपत त्यांचा डाव अवघ्या ७७ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर ठाणे केंद्र अ संघाचा डावही १०० धावांवर गडगडल्याने हा सामना आता रंगतदार स्थितीत आला आहे. घाटकोपर केंद्राच्या विवान जोबनपुत्र याने ४ तर सोहम सोनावणे याने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
अन्य सामन्यांत, कलिनाच्या एअर इंडिया मैदानावर एमसीए अकादमी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना १९७ धावा केल्या. त्यांच्या प्रणव अय्यंगार (५८), श्लोक माळी (४३), पार्थ माळी (३६) यांनी मोलाचे योगदान दिले. माटुंगा केंद्राच्या हिृदान ठक्कर याने ४ तर आतिश लाल याने ३ विकेट्स गुंडाळल्यामुळे एमसीए अकादमी ब संघाला दोनशे धावांच्या आत गुंडाळण्यात यश आले. प्रत्युत्तरादाखल, माटुंगा केंद्राने १५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात २८ धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफळ
गट अ
एमसीए अकादमी केंद्र (२) : सर्वबाद १९७ (प्रणव अय्यंगार ५८, श्लोक माळी ४३, पार्थ माळी ३६, हृदान ठक्कर ४/३७, अतिश लाल ३/४०) विरुद्ध माटुंगा केंद्र २८-२
कल्याण केंद्रः सर्वबाद 139 (अमोघ पाटील ५०, विजय पाल ५/१९ विरुद्ध भिवंडी आणि वांगणी केंद्र: १००/२ (यश म्हात्रे ४१*, इशान पाठक ३८.)
गट ब
पालघर आणि बोईसर केंद्र : सर्वबाद 172 (अरहान पटेल ४५, मानव केणी ४५, विधिराज शुक्ला ३२, निखिल गुरव ३/४७, युवान शर्मा ३/४३, निखिल वर्मा
३/२३) विरुद्ध आझाद मैदान केंद्र: ३६/४
वाशी केंद्र : सर्वबाद १२५ (यशराज काळसकर ५८, कविश गोसालिया ४/३९, धैर्य म्हात्रे ४/२४) विरुद्ध एमसीए अकादमी केंद्र (१): ११२/२ ( प्रितिश बेंगानी ६५*)
गट क
कांदिवली केंद्र : २५८/५ (युग असोपा १२१*, अद्वैत भट ३०) विरुद्ध कलिना केंद्र
विरार केंद्र (१) : ३१-१ विरुद्ध मालाड केंद्र
गट ड
घाटकोपर केंद्र : सर्वबाद ७७ (अक्षित सिन्हा ५/२२) विरुद्ध ठाणे केंद्र (१) : सर्वबाद १०० ( विवान जोबनपुत्र ४/२१, सोहम सोनवणे ३/७)
विरार केंद्र (२) : सर्वबाद ३०१ ( शाहीद खान १०९, सैफाली ४९, शिवा सिंग ३१, युवराज पाटील ३०, आयुष चव्हाण ३/३२ विरुद्ध ठाणे केंद्र(२) : ५०/३