
मुंबई :
दहावीनंतरचा पॉलिटेक्निक (अभियांत्रिकी पदविका) अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, वास्तुकला पदविका आणि बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका (डिप्लोमा इन फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आता तीनऐवजी चार प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या नव्या नियमालवलीची अमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे.
प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका हे अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित येतात. तसेच प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. वास्तुकला पदविका अभ्यासक्रम हा वास्तुकला परिषदेच्या अखत्यारित येतो. त्याचप्रमाणे प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र पदविका हा अभ्यासक्रम फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाच्या अख्यत्यारित येतात. या सहा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तांत्रिक पदविका शैक्षणिक संस्था (प्रवेश) नियम, २०१९ या कायद्यांतर्गत घेण्यात आला आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाकडून यंदा राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
हे महत्वाचे…
१.पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत तीन फेऱ्या राबविल्या जात असे. मात्र शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमांच्या चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने भरलेला पर्याय अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा मिळणार आहे. मागील फेऱ्यांमध्ये पर्याय अर्ज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना या चौथ्या फेरीमध्ये पर्याय अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पदविका अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, सरफेस कोटिंग व वास्तुकला या अभ्यासक्रमांसाठी कॅप फेर्यांची संख्या वाढवून आता चौथी कॅप फेरी समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी तीन फेर्यांनंतर प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येत असे. आता चौथ्या फेरीअंती प्रवेश अंतिम करण्यात येणार असून, दुसऱ्या फेरीनंतर अभ्यासक्रमांचा प्रवेश अंतिम ठरेल.
२. प्रत्येक फेरीत पात्र उमेदवारांना पर्याय निवड अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरता येईल. मागील फेरीतील पर्याय संपादित करण्याची मुभा असेल. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत दिलेल्या प्रथम क्रमांकाच्या तीन व सहा प्राधान्यक्रमांमधून जागा मिळाल्यास ती आपोआप निश्चित (फ्रीझ) मानली जाईल. अशा उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्रता राहणार नाही. जागा स्वीकारली नाही किंवा स्वहस्ते दस्तऐवज पडताळणी न केल्यास, उमेदवाराचा प्रवेश आपोआप रद्द होईल.
३. संस्थात्मक कोट्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर माहिती पुस्तिका प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादी, जागांची यादी आणि प्रवेश वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेस सर्वस्वी पारदर्शक व नियमानुसार पार पाडणे गरजेचे असेल.
४. प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची नोंद “ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स” या राष्ट्रीय पोर्टलवर आठ दिवसांच्या आत करणे अनिवार्य असेल. ही नोंद झाल्याशिवाय संस्थेला प्रवेश मान्यता दिली जाणार नाही.