शिक्षण

सीबीएसई शाळेत आता मातृभाषेतून धडे

भाषा शिक्षणासाठी अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे

मुंबई :

राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखडा (एनसीएफ-२०२३) मध्ये शिक्षणात मातृभाषेचा वापर शिक्षणाचे माध्यम म्हणून करण्यावर आणि बहुभाषिक दृष्टिकोनातून अतिरिक्त भाषांचा संरचित परिचय करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) भाषा शिक्षणविषयक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार सीबीएसई शाळांमध्ये मातृभाषा शिकविणे अनिवार्य होणार आहे. यामुळे भविष्यामध्ये सीबीएसई शाळांमधील मराठी भाषेचा मार्ग मोकळा होऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठीतून धडे मिळतील.

सीबीएसईच्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांची साक्षरतेची पहिली भाषा मातृभाषा किंवा परिचित प्रादेशिक किंवा राज्य भाषा असणे आवश्यक आहे. यामुळे भाषिक, सांस्कृतिक आणि संज्ञानात्मक संसाधनांचा वापर करून साक्षरता वाढवण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना सर्वात जास्त परिचित मातृभाषा असते. त्यामुळे ती त्यांच्या शिक्षणाची भाषा असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला दुसऱ्या भाषेत मूलभूत साक्षरता प्राप्त होईपर्यंत मातृभाषा ही शिक्षणाचे माध्यम म्हणून काम करेल. परंतु काही व्यावहारिक कारणांमुळे ते शक्य नसेल, तर ती राज्यभाषा ही त्यांच्या शिक्षणाची भाषा असावी.

सुरुवातीच्या टप्प्यावर अपेक्षित असलेल्या शिक्षणामध्ये प्रामुख्याने मौखिक आणि अनुभवात्मक यावर भर देण्यात यावा. मुलांमध्ये ऐकण्याची समज, तोंडी प्रवाहीपणा, शब्दसंग्रह, जाणीव आणि चिन्हे आणि छापील भाषेची उदयोन्मुख समज विकसित झाली पाहिजे. औपचारिक वाचन आणि लेखनाची सुरुवात अक्षरे ओळखण्यापासून आणि मातृभाषेमध्ये मूलभूत शब्द निर्मितीपासून करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना मातृभाषेतून देण्यात येणाऱ्या शिक्षणाचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती मूल्यांकन करून अभ्यासक्रमात आवश्यक बदल करेल आणि योग्य शिक्षण साहित्य निवडण्यासाठी मार्गदर्शन करेल. शिक्षकांनी जुलैपर्यंत बहुभाषिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षणदेखील पूर्ण केले पाहिजे. तसेच तीन ते आठ वयोगटातील मुलांना त्यांच्या मातृभाषेत मूलभूत साक्षरता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरीपर्यंत मुलांच्या शिक्षणासाठी मातृभाषा किंवा राज्यभाषा एक अनिवार्य भाषा म्हणून शिकविली जावी. राज्यातील शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी शिकवले जात असले तरी मराठी शिकवणे अनिवार्य होईल. मुलांच्या प्रारंभिक वयात मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासाला चालना मिळेल. शिक्षकांनी जुलैअखेरपर्यंच बहुभाषिक शिक्षणाचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक. सीबीएसईने शाळांना ‘एनसीईआरटी’च्या ‘जादुई पिटारा’ (कथाआधारित शिक्षण साहित्य) आणि बहुभाषिक डिजिटल पाठ्यपुस्तकांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *