
मुंबई :
महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंच्या विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण विभागाने मागणी केलेल्या पुस्तकांपैकी जवळपास ९६ टक्के पुस्तकांचा पुरवठा बालभारतीकडून मुंबई महानगरपालिकेला करण्यात आला आहे. ही सर्व पुस्तके २७ मेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व १२ ‘शहर साधन केंद्रा’पर्यंत (युआरसी) पोहचवण्यात आली आहे. यातील इयत्ता नववी व दहावीची पुस्तके १ जूनपासून शाळांमध्ये पोहचविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पुस्तके मिळण्यास मदत होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. ही पुस्तके बालभारतीकडून मागविण्यात येते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची २० लाख ८२ हजार ६६१ पुस्तके, तर इयत्ता नववी आणि दहावीची ५ लाख २० हजार ५५२ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकांच्या मागणीनुसार बालभारतीने पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची १९ लाख ७३ हजार ५४६ आणि इयत्ता नववी व दहावीची ५ लाख १४ हजार ५१९ पुस्तके अशी एकूण २४ लाख ८८ हजार ६५ पुस्तकांचा पुरवठा केला होता. यंदा १६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना वेळेत मिळावीत यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार बालभारतीकडून आलेली सर्व पुस्तके ही २७ जूनपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व १२ ‘शहर साधन केंद्रा’पर्यंत पोहचविण्यात आली आहेत. ‘शहर साधन केंद्रा’कडे पोहचविण्यात आलेली पुस्तके ही प्राधान्यक्रमानुसार पुढील काही दिवसांमध्ये शाळांमध्ये पोहचविण्यात येणार आहे. इयत्ता नववी व दहावीची शाळा १ जूनपासून सुरू होत असल्याने या विद्यार्थ्यांची पुस्तके प्रथम पोहचविण्याला प्राधान्य देण्यात येणा आहे. तर त्यानंतर इयत्ता पहिली ते नववीची पुस्तके पोहचविण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेकडून मागणी केलेल्या पुस्तकांपैकी १ लाख १५ हजार १४८ पुस्तके ही पुढील टप्प्यात येणार आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची १ लाख ९ हजार ११५ पुस्तके असून, इयत्ता नववी व दहावीची ६ हजार ३३ पुस्तके आहेत. या पुस्तकांचा लवकरच बालभारतीकडून पुरवठा करण्यात येणार आहे. ही पुस्तके येताच तातडीने ती ‘शहर साधन केंद्रां’पर्यंत पोहचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.