
मुंबई :
राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी केली. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉ माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे हेच ध्येय असेल असे सांगून सरनाईक म्हणाले, गेली ७७ वर्ष ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचं काम एसटीने अविरतपणे केलेल आहे. भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल. कारण महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला मिळालेल आहे.
७५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत. अर्थात, एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे. आज ७७ वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचे महत्त्व किंचितही कमी झालेले नाही. त्यामुळे लोकाश्रय लाभलेली आपली एसटी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी ‘स्मार्ट एसटी’ उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि सेवा जेष्ठतेनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या व्हाव्यात तसेच मानवी हस्तक्षेप पूर्णपणे थांबवा या उद्देशाने सर्व बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. त्याचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
यावेळी एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
यावेळी एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये धुळे -नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले , धुळे -नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन, जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे व सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा सरनाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.