
ठाणे
गेल्या ३३ वर्षांत शाळा, कॉलेज क्लब, ऑफिस, मुंबई आणि भारतासाठी खेळणाऱ्या १६ वर्षाखालील अगणित युवा क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीचा पाया पक्का झाला तो एलआयसी-एमसीए कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेतील सहभागाने. मुंबई क्रिकेट संघटनेने या स्पर्धेला निवड चाचणी स्पर्धा दिला. ही दर्जेदार स्पर्धा म्हणजे युवा क्रिकेटपटू घडवण्याचा कारखाना (फॅक्टरी) असल्याचे गौरवपूर्ण मनोगत मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केले. ३३ व्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्य नाईक बोलत होते.
ठाणे केंद्र अ संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज हर्ष कदम याची स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. एक शतक आणि एका अर्धशतकासह त्याने २०२ धावा फटकावताना २ फलंदाज देखील बाद केले. पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हर्ष म्हणाला मला आनंद झाला व पुढीलवर्षीही या स्पर्धेत खेळण्यासाठी मी पात्र आहे.
याप्रसंगी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह कार्यवाह अभय हडप, सह कार्यवाह दिपक पाटील, एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक शशांक सालोडकर, रणजित पिल्ले, गोपाळ शेलार, भास्कर अय्यर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अष्टपैलू दयानंद (दया) दुदवडकर यांना तर क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर स्मृती पुरस्कार पत्रकार विजय साळवी यांना प्रदान करण्यात आला.जेष्ठ पत्रकार भास्कर सावंत यांच्या ” महती मैदानांची ” या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. रणजीपटू गोपाळ कोळी यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबईचे रणजीपटू अब्दुल इस्माईल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.