
मुंबई :
तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार १ जुलै १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्स्प्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्स्प्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रेसने लावली.
गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्स्प्रेस धावत असे. परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली. मुंबई मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्स्प्रेसचे नामकरण मांडवी एक्स्प्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्स्प्रेस सोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्स्प्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी २०२४ पासून मांडवी एक्स्प्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी स्थित्यंतरे पाहत मांडवी एक्स्प्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे. रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार ७ जून २०२५ सकाळी ६ वाजता रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्स्प्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.
यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले. याचसोबत श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, निलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या संबंधित विभागांचे विशेष सहकार्य लाभले.