
मुंबई :
उदयपूरस्थित नारायण सेवा संस्थानाच्या वतीने मुंबईतील निको हॉल, नायगाव क्रॉस रोड, वडाळा उद्योग भवनजवळ, दादर येथे ‘नारायण लिम्ब आणि केलिपर्स फिटमेंट’ मोफत शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचा उद्देश शारीरिकदृष्ट्या असमर्थ असलेल्या व्यक्तींना चालण्यायोग्य बनवण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करणे हा होता. कृत्रिम अवयव बसवल्यानंतर दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसून आला. या शिबिरात मुंबईसह दूरवरून आलेल्या ४१९ दिव्यांगांना अपर-लोअर व मल्टिपल कृत्रिम अवयव आणि केलिपर्स लावण्यात आले.
या शिबिराचे मुख्य अतिथी जसवंतभाई शाह होते. अध्यक्षस्थानी शांतिलाल मारू होते. विशेष अतिथी म्हणून साध्वी यती किशोरी देवीजी, गुड्डी अग्रवाल, हर्ष बापना (आलोक इंडस्ट्रीज), श्याम सिंघानिया, नरेंद्र (इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी चेअरमन), सत्यसाई ट्रस्टचे डॉ. श्रीनिवास, कमल लोढा, सतीश अग्रवाल, गोपाल हलानी आणि टाटा टेली सर्व्हिसेस लिमिटेडच्या CSR विभागाकडून शीनू माथाई, सपना पंजाबी आणि कॉग्निझंट कंपनी, ICC आयलंड सिटी सेंटरचे अतिथी व स्वयंसेवक उपस्थित होते.
मुख्य अतिथी जसवंतभाई शाह म्हणाले, “नारायण सेवा संस्थान फक्त दिव्यांगांना सक्षम करत नाही तर त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि निराशाही दूर करत आहे. ही समाजोपयोगी सेवा आहे. अशा सकारात्मक विचारांमुळेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते.” त्यांनी संस्थेला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि संस्थापक कैलाश मानव व अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांच्या सेवाभावाचे कौतुक केले.
शिबिराचे अध्यक्ष शांतिलाल मारू म्हणाले, “ही उपक्रम योजना अशा घटकांसाठी आहे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा अपघातामुळे दिव्यांग झाले आहेत. आपल्या सर्वांचे ध्येय दिव्यांगांना नवजीवन आणि आत्मनिर्भरता प्रदान करणे आहे.”
शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सर्व अतिथींनी रुग्णांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव ऐकले आणि डॉक्टरांकडून फिटमेंट प्रक्रिया जाणून घेतली. लाभार्थी दिव्यांगांना प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी बास्केटबॉल व फुटबॉल खेळत सहभाग घेतला. शिबिराच्या सुरुवातीस नारायण सेवा संस्थानाच्या संचालिका पलक अग्रवाल, ट्रस्टी-संचालक देवेंद्र चोबीसा व महर्षि अग्रवाल यांनी मंचावरील अतिथ्यांचे मेवाडी परंपरेनुसार स्वागत केले.
संचालिका पलक अग्रवाल म्हणाल्या, “दिव्यांगांना त्यांच्या घराजवळच सेवा मिळावी म्हणून २३ मार्च रोजी मुंबईत शिबिर आयोजित केले होते. त्यात ५०० हून अधिक रुग्ण आले, त्यापैकी ४१९ दिव्यांगांची कृत्रिम अवयवासाठी निवड झाली. आज त्यांना नवजीवनाचे दान मिळाले आहे.” कार्यक्रमात दिव्यांगांनी कृत्रिम अवयव घालून परेड केली. संस्थेच्या डॉक्टरांनी त्यांना चालण्याचे प्रशिक्षण आणि कृत्रिम अवयवांच्या देखभालीची माहिती दिली. ट्रस्टी-संचालक देवेंद्र चोबीसा म्हणाले, “मुंबईत प्रथमच मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांनी जर्मन तंत्रज्ञानावर आधारित नारायण लिम्ब घालून घरी परतले. हे सर्वजण कधीतरी अपघातात हात-पाय गमावून हालअपेष्टा सहन करत होते.” या शिबिरात संस्थेच्या ८० जणांच्या टीमने सेवा दिली. मुंबई शाखेचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी अतिथ्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन महिम जैन यांनी केले.
नारायण सेवा संस्थान १९८५ पासून ‘नर सेवा – नारायण सेवा’ या भावनेने कार्यरत आहे. संस्थापक श्री कैलाश मानव यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री सन्मान प्रदान केला आहे. नुकतीच ३० मे रोजी दिल्लीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना ‘सामुदायिक सेवा व सामाजिक उत्थान’ या श्रेणीत सन्मानित केले. अध्यक्ष प्रशांत अग्रवाल हे वैद्यकीय, शिक्षण, कौशल्य विकास व क्रीडा अकादमीच्या माध्यमातून लाखो दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहेत. वर्ष २०२३ मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेने आतापर्यंत ४० हजारांहून अधिक कृत्रिम अवयव बसवले आहेत. आता संस्था मुंबईतील दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव सेवा मोठ्या प्रमाणावर देणार आहे.