
मुंबई :
गेले काही वर्षांपासून ठाणे, कसारा, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावर ताण निर्माण झाला असून लोकल गर्दीने भरून धावत आहेत. लोकलमध्ये पाय ठेण्यास जागा नसल्याने अनेकांचा प्रवासादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होत असून ठाणे ते बदलापूर आणि कसारा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या १५ महिन्यात या मार्गावर लोकलच्या विविध अपघातांमध्ये ६६३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे-कसारा व बदलापूर भागात राहणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास दिवसेंदिवस जीवघेण्या बनला आहे. दररोज हजारो प्रवासी लोकलच्या दरवाज्यांना, रिकाम्या जागांमध्ये लटकून प्रवास करतात. यामुळे दररोज लोकलमधून पडून प्रवाशांचे अपघात होत आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधून पडून ६६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना ३०९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर धावत्या लोकलमधून पडून २२३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत रेल्वे रूळ ओलांडताना ८२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर धावत्या लोकलमधून पडून ४९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये झाले आहेत.
अपघातांमधील ६६३ जणांपैकी ३९१ प्रवाशांचा मृत्यू रुळ ओलांडताना तर २७२ प्रवाशांचा मृत्यू धावत्या लोकलमधून पडल्यामुळे झाला आहे. अपघातांमध्ये पुरुष प्रवाशांचे प्रमाण अधिक असून, केवळ २०२४ या वर्षात ठाणे हद्दीत १४० पुरुषांचा मृत्यू झाला. डोंबिवलीत ५१ पुरुष तर कल्याणमध्ये तब्बल ९१ पुरुष अपघातात मृत्युमुखी पडले. महिला मृत्यूंची संख्या तुलनेने कमी असून ठाण्यात ११, डोंबिवलीत ३ आणि कल्याणमध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला.