मुख्य बातम्याशहर

अकरावी प्रवेश प्रक्रिया – कोट्यांतर्गत ६० हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

मुंबई :

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया शनिवारी सायंकाळी संपुष्टात आली. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीमध्ये राज्यभरातून ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सर्वाधिक प्रवेश इन हाऊस कोट्यांतर्गत २६ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यंनी अर्ज केले होते.

अकरावीच्या कोट्यातील प्रवेश प्रक्रियेला १२ जून रोजी सुरुवात झाली. इन हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत असलेल्या २ लाख २५ हजार ५१४ जागांसाठी राज्यभरातून १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत शनिवारी सायंकाळी ६ वाजता संपुष्टात आली. त्यावेळी अवघ्या ६० हजार ४८७ विद्यार्थांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतले. प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर झाल्याने १२ जून रोजी अवघ्या ९ हजार ८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र १३ जून रोजी २४ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी तर १४ जून रोजी २६ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजार ४८७ वर पोहचली.

कोटांतर्गत प्रवेशासाठी इन-हाउस कोट्यासाठी सर्वाधिक ५२ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्याखालोखाल अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत ३६ हजार ९९१ विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थापन कोट्यातून २३ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये इन-हाउस कोट्याअंतर्गत २६ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत २६ हजार २१० विद्यार्थ्यांनी आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत ७ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. कोट्यांतर्गत १ लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यातील अवघ्या ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील फेऱ्यांतून वगळण्यात येतील. तर ज्या विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतले नाही, त्यांची नावे पुढील फेऱ्यांसाठी कायम राहतील, अशी माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील एकूण ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालये/उच्च माध्यमिक शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. या संस्थांमध्ये एकूण २१ लाख २३ हजार ४० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामधून कॅप फेरीसाठी १८ लाख ९७ हजार ५२६ जागा राखीव असून, कोटाअंतर्गत २ लाख २५ हजार ५१४ जागा उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *